चैत्यभूमीला पोस्टकार्डे पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
जवळा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम; घरी राहूनच अभिवादन करण्याचा दिला संदेश
नांदेड – आनंद गोडबोले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांना अभिवादन करणारी पत्रे दरवर्षी चैत्यभूमीला पाठवली जात आहेत. गतवर्षीपासून महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान तसेच दक्षिणेकडील काही राज्यांतून हे अभियान सुरू झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या अभियानास मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक ढवळे जी. एस. आणि शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पोस्टकार्डे स्वत:च्या अक्षरात लिहून चैत्यभूमी, मुंबईकडे रवाना केली आहेत. या पोस्टकार्डच्या माध्यमातून ‘घरीच राहून बाबासाहेबांना अभिवादन’ हा संदेश दिल्यामुळे सदरील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी अभिवादनासाठी जमा होतात. यावर्षी भीमजयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्रप्रवर्तन दिन साधेपणाने आणि घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी काही आंबेडकरी नेत्यांनीही चैत्यभूमीवर न येता घरीच राहून अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आता ‘ओमायक्राॅनच्या’ भीतीमुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी पाहता बाबासाहेबांना घरीच राहून अभिवादन करण्यात यावे असे प्रशासनानेही कळविले आहे. त्याला प्रतिसाद देत जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी बाबासाहेबांप्रती कृतज्ञता आणि अभिवादन व्यक्त करणारी पत्रे लिहून चैत्यभूमी स्मारक, दादर (प)., मुंबई- ४०००२८ या पत्त्यावर पाठवून दिली आहेत. यावर्षीही देशभरातून लाखोंच्या संख्येने अभिवादन पत्रे येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या अनोख्या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करताच चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात आला. त्यात वैभवी शिखरे, किरण कदम, साक्षी गोडबोले, मुस्कान पठाण, शुभांगी गोडबोले, अक्षरा शिंदे, गितांजली गोडबोले, अक्षरा शिखरे, रितेश शिखरे, श्रावस्ती गच्चे, शादूल शेख, साक्षी गच्चे, कृष्णा शिखरे, श्रुती मठपती, योगेश मठपती, अनुष्का झिंझाडे, रितेश गवारे, लक्ष्मण शिखरे, तिरुपती शिखरे, दीपाली गोडबोले यांच्यासह अनेक मुलामुलींनी सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख यांची उपस्थिती होती. ही मुले आता उर्वरित विद्यार्थ्यांना व नातेवाईकांना ‘घरीच राहून अभिवादन’ या पत्राद्वारे अभिवादन करण्याच्या अभियानात सहभागी होण्यास प्रवृत्त करणार असल्याचे मुख्याध्यापक ढवळे यांनी सांगितले.
काय लिहिले आहे पत्रात?
‘प्रिय बाबासाहेब, तुमच्यामुळे आमची कुळी उद्धारलीं. शिक्षणामुळे आमच्या अनेक पिढ्यांचे कल्याण झाले. तुमचाच आदर्श घेऊन मी खूप खूप शिकणार आहे. खूप पुस्तके वाचणार आहे. कोरोनाकाळामुळे सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी आम्ही येऊ शकत नाही. तरी माझ्या परिवाराच्या वतीने माझे शब्दरुपी अभिवादन स्विकारावे, ही विनंती. जयभीम. ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपणास विनम्र अभिवादन!’ असा मजकूर असलेली स्वलिखित पोस्टकार्डे जवळा देशमुख येथील विद्यार्थ्यांनी चैत्यभूमी स्मारक समितीला पाठवली आहेत.