डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार तलाठी विजय जाधव यांना जाहीर.
नायगांव / प्रतिनिधी। ( रामप्रसाद चन्नावार )
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतिने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रशासकीय सेवेत राहूनही सामाजिक बांधिलकी जोपासीत कर्तव्यतत्पर असलेल्या तलाठी विजय जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान असलेल्या मान्यवरांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ. प्रमोद अंबाळकर,डॉ. पि.बी. नामवाड सय्यदपूरकर व प्रतिष्ठान चे अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा.भवरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पुरस्कार निवड समितीने यंदाच्या या पुरस्कारासाठी तलाठी विजय जाधव यांची निवड केली असून त्यांच्या स्वाक्षरीत निवडीचे पत्र आज लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड च्यावतिने एक दिवशीय पाचवी बौद्ध धम्म परिषद,सोनारीफाटा ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे येत्या दि.१४ जानेवारीला मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
नायगांव तालुक्यातील मोकासदरा येथील रहिवासी असलेल्या विजय पाटील जाधव यांची सन् १९९३ मध्ये तलाठी या पदावर नेमणूक झालेली असून अनेक ठिकाणी त्यांनी यशस्वीरीत्या सदरच्या पदावर काम केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतिने डिजिटल स्वाक्षरीचा गा.न. नं. ७/१२ देण्याच्या कामातील योगदानाबद्दल राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री आ.चंद्रकांत पाटील,तत्कालीन महसूल राज्यमंत्री आ.संजय राठोड व महसूल विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे. तसेच,महसूल दिनानिमित्त सन् २०११ व २०१२ -१३ मध्येही महसूल विभागाने अत्युकृष्ट कामासाठी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला असून तत्कालीन जिल्हाधिकारी धिरजकुमार यांनी त्यांना सन् २०१४-१५ या वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतिने दिल्या जाणाऱ्या आदर्श तलाठी या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.सद्या मौजे शेळगांव येथील सज्जासाठी ते तलाठी पदावर कार्यरत असून सोबतच,महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही सक्रिय आहेत.प्रशासकीय सेवेत असूनही सामाजिक बांधिलकी जोपासीत ते सदैव कर्तव्यतत्पर राहत असल्यानेच त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आगामी काळात प्रेरणा देण्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठी तलाठी विजय जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.