नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –
नायगाव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये राजसेतू कन्स्ट्रक्शन कंपनीच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक रस्ते खोदून कामे सुरू करण्यात आली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे “काम चालू आहे” असे सूचना फलक किंवा बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
रस्त्यांवर मोठे खड्डे, उघडी गटारे तसेच बांधकाम साहित्य विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशव्यवस्था किंवा इशारा फलक नसल्याने दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन सुरक्षा फलक लावावेत, कामे वेळेत पूर्ण करावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी नायगावकरांकडून होत आहे.






