नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क –
नायगाव दुय्यम निबंधक कार्यालयाच्या परिसरात कथित दलालांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा असून, दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांकडून रजिस्ट्रीच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शासनाच्या नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या शुल्काव्यतिरिक्त विविध कारणे सांगून नागरिकांकडून पैसे मागितले जात असल्याचा आरोप होत आहे.
जमीन, घर किंवा इतर मालमत्तेची खरेदी-विक्री करणारे नागरिक आधीच मोठ्या आर्थिक व्यवहारातून जात असताना, कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाइन प्रक्रिया, दस्त नोंदणी आणि इतर कामांच्या नावाखाली त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्या परिसरात दलाल सक्रिय असल्यास त्यांना नेमके कोणाचे अभय आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सामान्य नागरिकांना थेट आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याऐवजी मध्यस्थांमार्फत कामे करण्याची वेळ का येते, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, शुल्क आकारणीची प्रक्रिया आणि नागरिकांच्या तक्रारींची तपासणी करावी. दलाली अथवा बेकायदेशीर वसुली आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘शासकीय कार्यालय की दलालांचा अड्डा?’ हा प्रश्न आता नायगावच्या नागरिकांकडून थेट विचारला जात आहे.







Total Users : 200537